रविवारीच Week Off का? भारतीय कामगारांना ही हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट!

Labour Day 2024 Special Why Indian Workers Have Week Off On Sunday History And Facts: तुम्ही दर आठवड्याला रविवारची अगदी आतुरतेने वाट पाहता. मात्र रविवारची ही सुट्टी भारतात कधीपासून आणि कोणामुळे सुरु झाली ठाऊक आहे का?

स्वप्निल घंगाळे | Updated: May 1, 2024, 08:45 AM IST
 रविवारीच Week Off का? भारतीय कामगारांना ही हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट! title=
ते 7 वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढले

Labour Day 2024 Special Why Indian Workers Have Week Off On Sunday History And Facts: आज 1 मे, म्हणजे जागतिक कामगार दिन! जगभरामध्ये आजचा दिवस श्रमिक वर्गातील लोकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. कामगारांचे हक्क, त्यांच्या समस्या यांकडे लक्ष वेधण्याचं काम आतापर्यंत जगभरामध्ये अनेक कामगार नेत्यांनी केलं आहे. मात्र आजच्या कामगार दिनानिमित्त आपण अशा एका मराठमोळ्या कामगार नेत्यासंदर्भात जाणून घेणार आहोत ज्याच्यामुळे आज तुम्हाला-आम्हाला भारतामध्ये रविवारच्या दिवशी आठवडी सुट्टी मिळते.

कोण आहे ही मराठी व्यक्ती?

भारताबरोबरच जगभरातील बहुतांश देशांमध्ये रविवारचा दिवस हा आठवडी सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, शैक्षणिक संस्था, बँका, सरकारी, बिगरसरकारी कार्यालये सर्व काही बंद असतं. मात्र भारतामध्ये ही रविवारची सुट्टी नेमकी कधीपासून सुरु झाली? ही सुट्टी सुरु होण्यामागे मुंबईचं आणि एका मराठमोळ्या मुंबईकराशी खास कनेक्शन आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? या सुट्टीची गोष्टच आज आपण कामगार दिनानिमित्त जाणून घेणार आहोत. आज अगदी कॉर्परेट्सपासून ते सर्वच कंपन्यांना सामान्यपणे रविवारी सुट्टी असते. ही सुट्टी भारतात सुरु होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे, नारायण मेघाजी लोखंडे!

रविवारच्या सुट्टीचं मुंबई कनेक्शन

इंग्रजांनी भातावर दीडशे वर्षांहून अधिक काळ राज्य केलं. याच कालावधीमद्ये मुंबई शहर हे कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होतं. गिरगाव, लालबाग, परळ भागात अनेक कापड गिरण्या होत्या आणि त्यात हजारो भारतीय कामगार काम करायचे. कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावं लागायचं. त्यांना आठवड्यात एकही सुट्टी मिळत नसे. मात्र त्याचवेळी त्यांच्यावर देखरेख करणारे ब्रिटीश अधिकारी मात्र रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आवर्जून जायचे. यासाठी त्यांना एक दिवस आराम दिला जायचा. कामगार आणि त्यांचे ब्रिटीश वरिष्ठ यांच्यामध्ये भेदभाव केला जायचा. याविरुद्ध कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी आवाज उठवला. 

रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव मांडताना काय म्हटलेलं?

नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशनची 1884 साली स्थापना केली. कामागारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केली. त्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही त्यांच्या ब्रिटीश वरिष्ठाप्रमाणे एक दिवस आठवडी रजा द्यावी असा प्रस्ताव नारायण मेघाजी लोखंडेंनी इंग्रजांसमोर ठेवला. अर्थात सुरुवातीला हा प्रस्ताव इंग्रजांनी लगेच फेटाळून लावला. त्यानंतर नारायण लोखंडेंनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडताना, आम्ही कामगार स्वत:साठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आठवड्यातून सहा दिवस काम करोत. आम्हाला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुट्टी दिली जावी. देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामं करण्यासाठी हा दिवस आम्हाला दिला जावा, असं नारायण लोखंडे म्हणाले होते. काही ठिकाणी रविवार हा खंडोबाचा वार असल्याने त्या दिवशी आठवडी सुट्टी मिळावी असाही युक्तीवाद करण्यात आल्याचा संदर्भ सापडतो. त्यावेळी मुंबईत प्रामुख्याने कोळी समाजाचं वास्तव्य होतं. कोळी समाजामध्ये खंडोबाला विशेष महत्त्व असल्याने हा संदर्भ जोडल्याचंही सांगितलं जातं.

भारतात रविवारची पहिली सुट्टी कधी मिळाली?

नारायण लोखंडे यांनी रविवारी गिरणी कामगारांना सुट्टी मिळावी यासाठी एक दोन नाही तर तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. त्यांचा हा संघर्ष 1884 ते 1890 दरम्यान चालला. अखेर 24 एप्रिल 1890 रोजी लोखंडेंच्या नेतृत्त्वाखाली हजारो गिरणी कामगारांनी मुंबईत मोर्चा काढला. लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी हक्काच्या सुट्टीसाठी केलेल्या आंदोलनाची आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल अखेर इंग्रजांना घ्यावी लागली. सर्व गिरणी कामगारांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य करत असल्याचं जाहीर केलं. 1890 साली रविवारची सुट्टी सुरु झाली. भारतामध्ये रविवारची पहिली सुट्टी 10 जून 1890 साली मिळाली.

नक्की वाचा >> हा 26 वर्षीय भारतीय 400 कोटींचा मालक! फक्त कंप्युटर, इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर मिळवलं यश

महात्मा ज्योतिबा फुलेंचे सहकारी होते लोखंडे

यंदाच्या वर्षी 10 जून रोजी भारतात रविवारची सुट्टी सुरु झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाला 134 वर्ष पूर्ण होतील. पुढे 1948 साली देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही रविवारची सुट्टी कायम ठेवण्यात आली. लोखंडे यांना भारतातील ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक असंही म्हटलं जातं. लोखंडे महत्मा ज्योतीबा फुलेंचे निकटवर्तीय होते. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 2005 साली पोस्टाचे तिकीटही जारी केले होते.

ठाण्यात जन्म, मुंबईत निधन

1848 मध्ये ठाण्यात जन्म झालेल्या नारायण लोखंडे हे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून दिल्यानंतर 7 वर्षांनी म्हणजेच 9 फेब्रवारी 1897 रोजी नारायण लोखंडेंनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 

रविवारच्या सुट्टीचं धार्मिक कनेक्शन

आता रविवारीच सुट्टी देण्यामागील ब्रिटीश कनेक्शन समोर आलं असलं तरी यामागे एक धार्मिक कारणही आहे. भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं तेव्हा जवळपास सर्वच ब्रिटीश ख्रिश्चन धर्मिय होते. ते दर रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जायचे. ख्रिश्चन धर्मात रविवारला विशेष महत्त्व असण्याचा संदर्भ बायबल या धर्मग्रंथात सापडतो. बायबलमध्ये परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली त्याचे वर्णन आहे. त्यानुसार देवाने सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी विश्रांती घेतली. पाश्चिमात्यांचा आठवडा यावरच आधारित आहे. त्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असा असतो.  त्यामुळे देवाप्रमाणेच सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात. म्हणूनच ते विश्रांतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी चर्चमध्ये सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात.

धार्मिक कारणांमुळेच काही आखाती देशांमध्ये शुक्रवारी म्हणजेच जुम्म्याला आठवडी सुट्टी दिली जाते.