कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक, मुलांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याने तणाव

Kolhapur News Today: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येतेय. शालेय सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Updated: Jan 31, 2024, 06:17 PM IST
कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक, मुलांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याने तणाव title=
Kolhapur News Today Stone pelting on a school bus at Dussehra Chowk

Kolhapur News Today: कोल्हापुरातील दसरा चौक येथे शाळेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. बसमधील मुलांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्याने जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

बससह चारचाकी वाहनावर ही दगडफेक करण्यात आली असून दगडफेक झाल्यानंतर जमाव फरार झाला आहे. मुस्लिम बोर्डिंग समोर हा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुस्लिम बोर्डिंगसमोर बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळं बसवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली, असं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत जमाव तिथेन फरार झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम बोर्डिंगसमोरुन बस जात असताना शाळकरी विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. तेव्हा तिथेच उपस्थित असलेल्या जमावाने बसचा पाठलाग करत त्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत दोन- चार चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. कोल्हापुरात गालबोट लागल्याचा हा प्रकार आहे. 

शालेय बसवर दगडफेक करणारे कोण होते तसंच, मुस्लिम बोर्डिंगजवळ जाताच जय श्रीरामच्या घोषणा देणारे कोण होते याचादेखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, पण पोलिस यावर कोणत्याही प्रकारची भूमिका मांडण्यास तयार नाहीयेत. 

मीरा रोडमध्येही घडला होता असाच प्रकार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीरारोडमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मीरा रोडच्या नयानगरमध्ये दोन गटांत राडा झाला होता. 21 जानेवारी निघालेल्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी फौज तैनात करण्यात आली होती.  या प्रकरणात 13 लोकांना अटकही करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांना कठोर शासन केले जाईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. 

वाचा सविस्तर बातमीः मुंबईच्या मीरारोडमध्ये योगी पॅटर्न, तणावानंतर अवैध बांधकामांवर फिरवला बुलडोझर