मुलीचे अपहरण करून ३ लाखांना विकले

लातूर शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं.

Updated: Aug 3, 2017, 07:22 PM IST
मुलीचे अपहरण करून ३ लाखांना विकले title=

लातूर : लातूर शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं. आता त्या मुलीचा शोध लागलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

या प्रकरणी लातूर पोलिसांनी एका वधू-वर सूचक मंडळ चालविणाऱ्या महिलेसह १० जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गुन्ह्यांची यामुळे उकल होण्याची शक्यता आहे. 

लातूर शहरात धुणी-भांडी करून पित्याचे छत्र हरविलेल्या आपल्या मुलांना पीडित महिला सांभाळत होती. मात्र गेल्या महिन्यात त्यांच्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे भरदिवसाअपहरण करण्यात आले. या टोळीच्या माध्यमातून अवघ्या तीन ते चार लाखात या अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यात आला होता. 

तासगाव तालुक्यातील सारवडे गावातील उमेश माने या ३४ वर्षीय व्यक्तीसोबत त्या मुलीचे लग्न लावून दिलं होतं.  पूनम शहाणेसह ईश्वर शहाणे, आफरीन शेख, लक्ष्मीबाई पवार, संगीता अशोक वाङ, शांता निकम, दीपक जाधव, शोभा जाधव, उमेश माने आणि सतीश माने यांना अटक झाली आहे.