विवाहातील खर्च टाळून दोन हजार गरिबांना मोफत 'शिवभोजन थाळी'

नियमाप्रमाणे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला

Updated: May 25, 2020, 09:17 PM IST
विवाहातील खर्च टाळून दोन हजार गरिबांना मोफत 'शिवभोजन थाळी'  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर :  कोरोना संकटाच्या काळात लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे जाधव- हलगरकर परिवारात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. कोरोनामुळे अनावश्यक भोजन, डेकोरेशन, सभागृहावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात टळला. त्यामुळे यातून गरीब, मजुरांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत भोजन देण्याचा संकल्प वर पक्षाकडील जाधव कुटुंबीयांनी केला.

त्यातून दोन हजार जणांना ०५ रुपये थाळीप्रमाणे मोफत शिवभोजन देण्यासाठीचा खर्च जाधव कुटुंबीयांनी उचलला. लग्न लागल्यानंतर त्यांनी निलंगा येथील शिवभोजन थाळीच्या हॉटेल व्यवस्थापकांकडे  १० हजार रुपयांचा धनादेश नववधू-वरांच्या हस्ते सुपूर्द केला. यातून दोन हजार गरीब, शेतमजुरांना पुढील काही दिवस मोफत भोजन मिळू शकणार आहे. कोरोनामुळे भोजनावर होणार खर्च टळल्यामुळे अशा पद्धतीने सामाजिक दृष्टिकोन ठेवून ही मदत केल्याचे वर बंधू एम.एम. जाधव यांनी सांगितलं. 

राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे  शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.