मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय पायी वारी

 १५ ऑक्टोबरपासून तुळजापूर ते मंत्रालय प्रवासाला सुरुवात

Updated: Oct 21, 2020, 06:32 PM IST
मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय पायी वारी title=

बारामती : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाजातील पाच युवक साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करुन मुंबईत येणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहेत. १५ ऑक्टोबरला त्यांनी तुळजापूर ते मंत्रालय हा प्रवास सुरु केलाय. इंदापूरमध्ये दाखल होताच त्यांनी 'जय जिजाऊ जय शिवराय'च्या घोषणा दिल्या. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले.

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी आम्ही हा लढा पूकारल्याचे आंदोलक बाळासाहेब माने यांनी सांगितले. मराठा बांधवांना आरक्षण देण्यात राज्यकर्त्यांना जाग यावी आणि समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हा पायी प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना भेटून आमच्या व्यथा मांडणार आहोत असे ते पुढे म्हणाले. 

दरम्यान मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत जवळपास १५ ठराव मंजूर करण्यात आले होते.  त्यानुसार..

- मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

- मराठा समाजातील मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.

- केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा. 

- महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.

- सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी. 

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.

- राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.

- मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.

- मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.

- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.

- स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.

- अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.

- राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. 

- कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी. 

- राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.