सांगलीतील १२५ पूरग्रस्त कुटुंबांना मिळणार पर्यावरणपूरक घरे

घरात सोलर लाईट सिस्टीम, इकोफ्रेंडली टॉयलेट, रेन वोटर सिस्टीम या सुविधा दिल्या जाणार आहेत.

Updated: Sep 10, 2019, 12:17 PM IST
सांगलीतील १२५ पूरग्रस्त कुटुंबांना मिळणार पर्यावरणपूरक घरे title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पर्यावरणपूरक घरे बांधून दिली जाणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पलूस तालुक्यातील दोन गावातील १२५ पूरग्रस्त कुटुंबांना अद्यावत घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. 

तावदरवाडी (धनगाव) आणि भिलवडी येथील पुररेशीतील या कुटुंबांना ही घरे दिली जाणार आहेत. दिवाळीपर्यंत या घरांचे ५० टक्के बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. 

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला. अनेक लोकांची घरे पुराच्या पाण्यात बुडाली होती. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शेकडो लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले.

पूर ओसरल्यानंतर पुर पट्ट्यात येणाऱ्या पुरग्रस्तांसाठी शासनाने तातडीने चांगला निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूररेषेत येणाऱ्या पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार आहे. पलूस तालुक्यातील तावदरवाडी (धनगाव) येथील ५५ आणि भिलवडी येथील ७० कुटुंब अशी एकूण १२५ कुटुंबांना अद्यावत घरे बांधून दिली जाणार आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष नयन शहा, प्रवीण दोशी, मयूर शहा, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांनी भिलवडी आणि बुरुंगवाडी येथील जागांची पाहणी केली आणि पुरबाधित ग्रामस्थांशी चर्चा केली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि महाराष्ट्र शासनाने हा घर बांधून देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी जवळपास ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

दीड हजार स्क्वेअर फूट जागा एका कुटुंबाला देण्याचे नियोजन होते. मात्र, ग्रामस्थांनी दीड हजार ऐवजी एक हजार स्क्वेअर फूट जागा द्यावी म्हणजे अधिक पूरग्रस्तांना घरे उपलब्ध होतील अशी विनंती केली. या विनंतीचा विचार करून प्रत्येकाला एक हजार स्क्वेअर फूट जागा दिली जाणार आहे.

पात्र १२५ प्रत्येक कुटुंबाना एक हजार स्क्वेअर फूट जागा मिळेल. त्यात ४०० स्क्वेअर फुटात तीन खोल्या संडास, बाथरूम आणि उर्वरित ६०० स्क्वेअर फुटात मागे गोठ्यासाठी जागा आणि पुढे जागा मिळणार आहे. घरात सोलर लाईट सिस्टीम, इकोफ्रेंडली टॉयलेट, रेन वोटर सिस्टीम या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे त्या कॉलनीत अंतर्गत रस्ते, लाईट, पाणी अश्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

एक मॉडेल व्हिलेज या ठिकाणी लवकरात लवकर उभे केले जाईल. यातील ५० टक्के घर दिवाळीपर्यंत पूर्ण केली जाणार असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही घरे वितरीत करण्यात येतील.