मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ, तीन हजार कोटींची गरज

 सध्या २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून विभागात ७०० टँकरही सुरू

Updated: Dec 19, 2018, 10:48 AM IST
मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ, तीन हजार कोटींची गरज   title=

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर झाली आहे. तसा अहवाल शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मराठवाड्यातील एकूण आठ हजार ५३३ गावांपैकी ७२८१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे तर १२५२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ आहे आणि आता या दुष्काळी शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. या संकटातून सावरण्यासाठी मराठवाड्याला तीन हजार कोटींची गरज असल्याचं सांगितलं जातंय. 

मराठवाड्यातील सुमारे ४८ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झालंय. ७२८१ गावं कमी पावसामुळे प्रभावित झालेली आहेत. विभागातील ४२१ मंडळांपैकी ३१३ मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आलाय. चारा पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिती गंभीर आहे. 

२०१८ मध्ये ४८ एकरावर प्रत्यक्ष पेरणी झाली. सद्यस्थितीत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून विभागात ७०० टँकरही सुरू आहे. मराठवाड्यातील फक्त हिंगोली जिल्ह्यातील गावांचीच आकडेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आली आहे, बाकी सगळीकडे भीषण अवस्था आहे.