Coronavirus : दिलासा की चिंता, काय सांगते राज्यातील कोरोना रुग्णांची नवी आकडेवारी?

राज्याचा एकूण रिकव्हरी रेट पोहोचला....   

Updated: Oct 5, 2020, 08:51 PM IST
Coronavirus : दिलासा की चिंता, काय सांगते राज्यातील कोरोना रुग्णांची नवी आकडेवारी?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोनाव्हायरसचा coronavirus प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच बळावताना दिसत आहे. देशात आणि संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. एकिकडे देशभरात दर दिवशी हजारोंच्या संख्येनं नवे कोरोनाबाधित आढळत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातही परिस्थिती काहीशी चिंताजनक असल्याचं दिसत आहे. 

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १०,२४४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, १२,९८२ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर घरी पाठवण्यात आलं. या आकडेवारीमध्ये २६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. 

कोरोना रुग्णांची ही एकूण संख्या पाहता, आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १४,५३,६५३ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये मृतांचा आकडा ३८,३४७ वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ११,६२,५८५ वर गेली आहे. सध्याच्या घडीला राज्यात २,५७,२७७ रुग्णांवर कोरोनासाठीचे उपचार सुरु असल्याची माहितीही देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांतील रिकव्हरी रेट ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यांमुळं राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे. 

 

राज्यात दररोज मोठ्या संख्येनं कोरोना चाचण्याही सुरु आहेत. परिणामी क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये २२,००,१६० होम क्वारंटाईन आणि २६,७४९ हे संस्थात्मक अर्थात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत.