राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार, महत्वाचा निर्णय

 राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय

Updated: Dec 3, 2020, 01:41 PM IST
राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार, महत्वाचा निर्णय title=

मुंबई : राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.  

यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी 'अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास' असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार' असे करण्यात आलेले आहे.

मा.राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये 'दलित' शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत 'Scheduled Caste & Nav Bouddha' आणि मराठी भाषेत 'अनुसूचित जाती व नव बौध्द' या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.