अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

या घटनेनंतर गुणोरे गावात शोककळा पसरली आहे. 

Updated: Aug 26, 2019, 03:21 PM IST
अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, अहमदनगर : पारनेर तालुक्यात एकाच कुटुंबातल्या चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अख्ख्या कुटु्ंबानं उचललेल्या या टोकाच्या पावलामागचं नेमकं कारण अजून कळलेलं नाही. पती, पत्नी आणि २ लहान मुलांची आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यातल्या गुणोरे इथे एकाच कुटुंबातल्या चार जणांनी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी असलेले बाबाजी विठ्ठल बढे, त्यांची पत्नी कविता, मोठा मुलगा आदित्य आणि धाकटा मुलगा धनंजय या चौंघांचे राहत्या घरात गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले. 

बाबाजी बढे यांच्या पत्नी कविता या मानसिक रुग्ण होत्या तर मोठा मुलगा आदित्य हा दिव्यांग होता. त्यामुळे कौंटुबिक तणावातून बाबाजी बढे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत पारनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

या दुर्दैवी घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, गुणोरे गावात शोककळा पसरली आहे.