देवाची करणी अन् नारळात पाणी! पण हे पाणी आत पोहोचतं कसं? वैज्ञानिक कारण जाणून घ्या

How Coconut Gets Water: नारळाचे पाणी हे अनेकांचे आवडते पेय आहे. पण तुम्हाला माहितीये का नारळाच्या आत पाणी येते कुठून  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2024, 01:42 PM IST
देवाची करणी अन् नारळात पाणी! पण हे पाणी आत पोहोचतं कसं? वैज्ञानिक कारण जाणून घ्या title=
genereal knowledge quiz do you know from where coconut water comes

How Coconut Gets Water: देवाची करणी अन् नारळात पाणी ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. पण तुम्हाला माहितीये का नारळात पाणी येते तरी कुठून, यामागील वैज्ञानिक कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्या आधी नारळाचे पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे त्याबद्दल जाणून घेऊया. 

नारळाचे पाणी हे आरोग्यासाठी खूप गुणकारी असते. नारळाच्या पाण्यामुळं किडणी स्टोन तसंच, हृदय रोगावरही प्रभावी आहे. इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सीडेंटने युक्त असलेले हे नारळाचे पाणी प्यायल्यामुळं शरीरात डिहायड्रेशनची समस्या कमी होते. तसंच, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. जर जास्त थकवा जाणवत असेल तर नारळाचे पाणी प्यायल्यास थकवा नाहीसा होता व शरीरात उर्जा निर्माण होते. नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी 2, बी 3, बी 1, पॅटोथेनिक अॅसिड, फोलिक अॅसिड, बायोटिन, पोटेशियम आणि सोडियम असते. यात कार्बोहायड्रेट आणि अॅमिनो अॅसिडची मात्रा देखील आढळली जाते. थोडक्यात नारळाचे पाणी हे अमृता समान आहे. 

नारळाच्या आत हे पाणी येते कुठून याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया. नारळाच्या आतील पाणी म्हणजे खर तर वनस्पतीच्या एंडोस्पर्मचा एक भाग आहे. नारळाचे झाड हे पाणी साठवण्यासाठी आपल्या फळाच्या आतील भागाचा वापर करतो. नारळाच्या झाडाचे पाणी हे मुळांद्वारे पोहोचवले जाते. मुळं आणि फळांच्या पेशीद्वारे हे पाणी फळांच्या आत येते. 

नारळ पिकू लागतो तसे एंडोस्पर्म पाण्यात विरघळू लागतात आणि पाणी सुकण्यास सुरुवात होते. म्हणजेच आपण जे खोबरं खातो ते या एंडोस्पर्मचे घन स्वरुप असतात. ही प्रक्रिया नारळाच्या झाडाच्या पेशीद्वारे होते. नारळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन बी 12, पोटेशियम, सोडियम, फॉसप्रस, मॅग्नेशियम असते. नारळ फळाची जस जशी वाढ होते तसे हे पाणी दाट स्वरूप घेते. नारळ पाणी प्यायल्यावर त्यात असलेली मलई आपण बघीतली असेलच. फळ पूर्ण झाल्यावर फळात खोबरे तयार होते. नारळाच्या पाण्याची चव ही नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळी असते. नारळाचे पाणी चवीने गोड असते. त्यामुळंच नारळाच्या पाण्याला अमृत असंही म्हणतात. 

दरम्यान, नारळाचे पाणी हे बहुगुणी असते. उन्हाळ्याच्या दिवसांत व आजारी व्यक्तीस हमखास नारळाचे पाणी प्यायला देतात. या पाण्यात कॅलरी कमी असतात तसंच, नॅचरल एंझाइम्सदेखील असतात. नारळाचे पाणी हे उत्तम पेय आहे. नारळपाणी रोज प्यायल्यामुळं तुमची रोगप्रतिकारशत्ती अधिक वाढते. तसंच, त्वचादेखील उजळते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)