मुंबईत राहणाऱ्या पतीसोबत कडाक्याचे भांडण, पत्नीने तीन मुलांचा जीव घेतला अन् मग...

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या भांडणात तीन मुलांचा बळी गेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 3, 2023, 03:19 PM IST
मुंबईत राहणाऱ्या पतीसोबत कडाक्याचे भांडण, पत्नीने तीन मुलांचा जीव घेतला अन् मग... title=
Woman Thrown Three Innocent Child Into Well after fight with husband

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या भांडणात (Husband- Wife News) तीन मुलांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे ही घटना घडली आहे. पतीसोबत फोनवर झालेल्या वादा-वादीनंतर पत्नीने एका धक्कादायक कृत्य केलं आहे. तिच्या या कृत्यामुळं तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. सुधा असं या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी करत आहेत. (Woman Thrown Three Innocent Child Into Well)

पतीसोबत कडाक्याचे भांडण

मिर्झापूर जिल्ह्यातील संतनगर ठाणे हद्दीत येणाऱ्या पजरा गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. रात्री साधारण १२ वाजता सुधा तिचा पती अमरजीतसोबत फोनवर बोलत होती. अमरजीत हा मुंबईत काम करतो. फोनवर बोलत असताना दोघांमध्ये वादा-वादी झाली. दोघांपैकी कोणीही माघार घेईना. सुधा आणि अमरजीतमधले वाद वाढत गेले.

रागाच्या भरात तीन मुलांना विहिरीत फेकले

सुधाने अमरजीतसोबत झालेल्या भांडणानंतर तिच्या तीन मुलांना विहिरीत फेकले. आकाश, कृती आणि अन्नू अशी तिन मुलांची नावे आहेत. मुलांना विहिरीत फेकल्यानंतर सुधाने स्वतःला घरात बंद करुन घेत पेटवून घेतले. मात्र, आगीच्या ज्वाळा वाढत असताना सुधाने आरडा-ओरडा सुरू केला. सुधाचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या लोकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. व सुधाचा जीव वाचवला. 

स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न

आग विझवल्यानंतर शेजारी घरात गेले. तिथे तीन मुलं दिसली नाही तेव्हा त्यांनी त्यांच्याबाबत विचारले असता तिने तिघांना विहिरीत फेकल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतल्यावर कृती आणि अन्नूचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनाही घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आकाशचा मृतदेह बाहेर काढला. 

पती दोन महिन्यांपासून मुंबईत

मुलांचे आजोबा श्यामधर यांनी दिलेल्या माहितीनुसार. रात्री आम्ही सगळेजण जेवण करुन झोपलो होतो. मुलगा अमरजीत दोन महिन्यांपासून मुंबईत राहून मजदूरी करतो. रात्री सुनेसोबत तो बोलत होता. मात्र, त्याचवेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं माहिती नाही. पण त्यानंतरच सुनेने हे भयंकर पाऊल उचललं. 

महिला पोलिसांच्या ताब्यात

कौटुंबीक वाद-विवादानंतर महिलेने तिच्या तीन मुलांना विहिरीत फेकले. आम्हाला माहिती मिळताच आम्ही तातडीने तिथे धाव घेतली. महिलेला ताब्यात घेतलं आहे तसंच, तिची चौकशी केली जात आहे. तसंच, इतर कारवाईदेखील करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.