ओशो : जीवनाचा पाठ शिकवणारे ‘रजनीश’ यांचा मृत्यु आजही एक रहस्य

आपल्या जीवनात भाषणांमुळे आणि प्रवचनांमुळे नेहमीच वादात राहिलेले आध्यात्मिक गुरू ओशो ऊर्फ रजनीश यांची आज पुण्यतिथी.

Updated: Jan 19, 2018, 11:27 AM IST
ओशो : जीवनाचा पाठ शिकवणारे ‘रजनीश’ यांचा मृत्यु आजही एक रहस्य title=

नवी दिल्ली : आपल्या जीवनात भाषणांमुळे आणि प्रवचनांमुळे नेहमीच वादात राहिलेले आध्यात्मिक गुरू ओशो ऊर्फ रजनीश यांची आज पुण्यतिथी.

१९ जानेवारी १९९० मध्ये ओशो यांचे निधन झाले होते. मात्र त्यांचा मृत्युही वादात सापडला होता. त्यांच्या काही शिष्यांनी आशो यांचा मृत्यु नैसर्गिक नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या मृत्युचं रहस्य उलगडलं नाहीये. 

मृत्युवर वाद का?

१९ जानेवारी १९९० मध्ये पुण्याच्या आश्रमात ओशो यांचा मृत्यु झाला होता. मृत्युच्या तब्बल २२ वर्षांनंतर ओशो यांच्या शिष्यांनी आणि ओशो फ्रेन्ड फाऊंडेशनचे योगेश ठक्कर ऊर्फ प्रेमगीत यांनी ओशो यांच्या मृत्युपत्रात घोळ असल्याचा आरोप लावत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच सीबीआयच्या चौकशीची मागणी केली होती. ठक्कर यांनी आरोप लावला होता की, ओशो यांच्या बौद्धिक संपत्तीचे राईट्स आणि त्यातून होणारी कमाई न्यूरिख, स्वित्झरलॅंड, अमेरिका आणि इतर देशांमध्ये दिली जात आहे. यात त्यांनी ओशो फांऊडेशनच्या सहा ट्रस्टींची नावेही सांगितली होती. 

ही याचिका दाखल केल्यावर काही दिवसांनी पुण्याचे डॉक्टर गोकाणी यांनी ओशो यांच्या मृत्युशी निगडीत एक खळबळजनक खुलासा केला होता. डॉ. गोकाणी म्हणाले होते की, ते ओशो यांच्या मृत्युवेळी पुणे येथील आश्रमाच्या लाओत्से हाऊसमध्ये उपस्थित होते. ओशो यांच्या मृत्युच्या ५ तास आधी आश्रमात अनेक रहस्यमयी घटना घडल्या होत्या. 

डॉक्टरांना बोलवूनही भेटू दिलं नाही

डॉ. गोकाणी म्हणाले होते की, ते आश्रमात उपस्थित असल्यवरही त्यांना ओशोनां बघूही दिलं नाही. त्या दिवशी आश्रमाचे स्वामी जयेशचे प्रायव्हेट सेक्रेटरी स्वामी चितन यांनी त्यांना फोन करून बोलवले होते. त्यांना सांगण्यात आलं होतं की, ओशो देहत्याग करत आहेत, तुम्ही त्यांना वाचवा. पण जेव्हा डॉक्टर तिथे पोहचले त्यांना ओशो यांच्याजवळ जाऊच दिले नाही. त्यानंतर अचानक शेवटच्या क्षणी ओशो यांच्यासोबत असलेले डॉक्टर अमृतो यांनी सांगितले की, ओशो यांचं जीवन संपत आहे.

डॉ. गोकाणी यांनी काही तर्कांसोबत कोर्टात एक अ‍ॅफिडेविट सादर केले होते. डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात संपूर्ण घटनाक्रम लिहिला होता. त्यांनी लिहिले की, ‘तिथे मी साधारण २ वाजता पोहोचलो. त्यांच्या शिष्यांनी सांगितले की, ओशो देहत्याग करत आहेत. तुम्ही त्यांना वाचवा. पण मला त्यांच्याजवळ जाऊ दिलं नाही. अनेक तास आश्रमात फिरत असताना मला त्यांच्या मृत्युची बातमी देण्यात आली आणि सांगितले की, डेथ सर्टिफिकेट तयार करा’.

तर दुसरीकडे ओशो यांच्या सचिव नीलम यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्युबाबत शंका व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ओशो यांची आई सुद्धा आश्रमात राहत होती. पण त्यांनाही मृत्युची सूचना उशिरा दिली गेली. ओशो यांच्या मृत्युनंतर बराच वेळ त्या ‘बेटा उन्होने तुम्हे मार दिया’, असे म्हणत राहिल्या, 

डॉ. गोकाणीच्या येण्याने ठक्कर यांना बळ

ओशो यांच्या मृत्युवर शंका घेणारे ठक्कर यांना अचानक प्रकाशझोतात आलेल्या डॉ.गोकाणी यांचे समर्थन मिळाले. डॉक्टरांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, ‘ओशो यांच्या मृत्युचा वाद बाहेर येऊ नये म्हणून मी काहीच बोललो नव्हतो. पण काही वर्षांनी अमृतो आणि जयेश जी वक्तव्य केले आहेत त्यात तफावत आहे. मला केवळ डेथ सर्टिफिकेट देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. १९ जानेवारी १९९० या दिवशी आश्रममध्ये अनेक डॉक्टर होते. तरीही अमृतो आणि जयेशने कुणाची मदत घेणे किंवा त्यांना रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे समजले नाही. त्याहून महत्वाची बाब म्हणजे मृत्युच्या पब्लिक अनाउंन्समेंटच्या ६० मिनिटांनंतरच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले’.