CAA ला गल्लीपासून दिल्लीपर्यंत विरोध, काही ठिकाणी हिंसक आंदोलन

उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ आणि दगडफेक, बसही पेटवली तर आंदोलनामुळे गुरुग्राममध्ये वाहतूक कोंडी

Updated: Dec 19, 2019, 04:37 PM IST
CAA ला गल्लीपासून दिल्लीपर्यंत विरोध, काही ठिकाणी हिंसक आंदोलन  title=

नवी दिल्ली / मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतेय. आज देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. राजधानी दिल्लीत खबरदारी म्हणून लाल किल्ला, जामा मशीद, चांदणी चौक इथं कडक बंदोबस्त आहे. तसंच विश्वविद्यालय इथल्या मेट्रोचे स्टेशनचं प्रवेशद्वार बंद आहे. देशातील अनेक भागांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आलं आहे. देशभरात ठिकठिकाणी नागरिक रस्त्यांवर उतरुन विरोध प्रदर्शन करतायत. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. या दरम्यान दिल्लीच्या सूरजमल स्टेडियममध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. स्टेडियममध्ये आंदोलनाला बसल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांना पोलीस खाद्यपदार्थ वाटताना दिसले.

गुरुग्राममध्ये वाहतूक कोंडी

हरियाणातल्या गुरुग्राममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्याचा फटका वाहन चालकांना बसतोय. याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतेय.

(#CAA: इतिहासकार रामचंद्र गुहांना पोलिसांकडून अटक)

हा सगळा खेळ व्होटबँकेसाठी?

नागरिकत्व सुधारणा कायद्याला उत्तर प्रदेशातही विरोधाला सामोरं जावं लागलंय. अनेक लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. समाजवादी पार्टीने या कायद्याला विरोध दर्शवलाय. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी हा कायदा भाजपने आपल्या व्होटबॅंकेसाठी संमत केल्याचा आरोप केलाय. या कायद्यामुळे सर्वसाधारण नागरिकांमध्ये भीती निर्माण होतेय त्यामुळे केंद्राने लागू केलेला हा नवा कायदा आपल्याला मान्य नसल्याचं अखिलेश यांनी म्हटलंय.

नागपुरातही आंदोलन

एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय मुस्लिम परिषद आणि जमाते इस्लामे हिंद यांनी मोर्चा काढला. या मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवलाय. हा मोर्चा विधानभवनावर धडकलाय.

मुंबईत आझाद मैदानात विरोध प्रदर्शन

नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी आज मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष सहभागी आहेत. विशेष म्हणजे शिवसेना मोर्चात सहभागी होण्याची शक्यता नाही. कायदा संसदेत संमत होत असतानाही शिवसेनेची लोकसभा आणि राज्यसभेत दुटप्पी भूमिका होती. आज होणाऱ्या मोर्चात अनेक सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत. यात फरहान अख्तर, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, कुणाल कामरा, अनुभव सिन्हा ही मंडळीही सहभागी होणार आहेत. याशिवाय मुंबईतल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. काळे टिशर्ट आणि लाल रिबीन बांधून टाटा इन्स्टीट्यूट ऑफ  सोशल सायन्सचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारीही केलीय.

मालेगावातही मोर्चा

मालेगावमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC विरोधात मोर्चा काढण्यात आला. शहरातील भुईकोट किल्ल्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. हजारो मुस्लीम बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चा निमित्त शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.