गाव स्वच्छ करा, लग्नासाठी मुलगी मिळवा: हरियाणाचे मंत्री

अविवाहीत तरूणांसाठी मंत्री महोदयांनी सादर केली भलतीच योजना

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 3, 2018, 01:34 PM IST
गाव स्वच्छ करा, लग्नासाठी मुलगी मिळवा: हरियाणाचे मंत्री title=

चडागढ : हरियाणाचे कृषी आणि संसदीय कामकाज मंत्री ओम प्रकाश धनखड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गावची स्वच्छता करा आणि लग्नासाठी मुलगी मिळवा, असे वक्तव्य धनखड यांनी केले आहे.

पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

वादग्रस्त वक्तव्य करण्याची ओम प्रकाश धनखड यांची ही पहिलीच वेळ नाही. २०१४च्या निवडणूक प्रचारदरमन्यानही धनखड यांनी हरियाणातील अविवाहीत तरूणांसाठी बिहारमधून मुली (वधू) आणल्या जातील असे वक्तव्य केले होते. तेव्हाही त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली होती. त्यावर चौफेर टीका झाली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा धनखड चर्चेत आहेत. त्यालाही अशाच वादग्रस्त वक्तव्याची पार्श्वभूमी आहे.

गावागावात स्वच्छता वाढावी. गावे साफ व्हावी यासाठी मंत्री महोदयांनी एक अनोखी योजनाच लोकांना सांगितली. या योजनेची माहिती देताना धनखड महोदयांनी गावांतील अविवाहीत तरूणांकडे मोर्चा वळवला. ते म्हणाले, आवल्या गावातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी तरूणांनी प्रयत्न करावेत. गाव स्वच्छ झाल्यास त्याचा परिणाम म्हणून अविवाहीत तरूणांना विवाहासाठी मुली (वधू) मिळतील.

जिल्हास्तरीय शिबिरात तरूणांना विवाहाचे आमिष

गेल्या महिन्यातच ओमप्रकाश धनखड यांनी हरियानातील गावांची स्वच्छता स्थिती सुधारण्यासाठी एक रेटींग योजना जाहीर केली होती. ज्यात गावाला त्यांच्या कामगिरीनुसार तीन, पाच आणि सात असे स्टार दिले जातील. या योजनेबाबत राज्यातील झज्जर येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या जिल्हास्तरीय शिबिरात धनखड यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी गावच्या विकासासोबतच स्टार रेटींग प्रणाली अविवाहीत तरूणांना विवाहाची संधीही देईल अशी आशा दाखवली.

अविवाहीत मुलींचे पालक करतील गावची तपासणी

दरम्यान, धनड पुढे म्हणाले, अविवाहीत तरूणींचे पालक गावची स्वच्छता तपासून, त्यानुसार रेटींग देतील. या अभियानात अविवाहीत महिलाही सहभागी होऊ शकतात. गावची स्वच्छता पाहून त्याही आपल्या भविष्यातील जोडीदाराची निवड करू शकतात.

हरियाणात  अविवाहीत तरूणांची प्रचंड संख्या

हरियाणात मुलींचे दर पुरूषी प्रमाण हे फारच कमी आहे. त्यामुळे राज्यातील अविवाहीत तरूणांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरूण दुसऱ्या राज्यातील मुलींसोबत लग्न करायला प्राधन्या देत आहेत.