देशभरात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन, कोरोनाच्या रुग्णांची संख्या 391 वर

कोरोनामुळे देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 

Updated: Mar 23, 2020, 07:36 AM IST
देशभरात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन, कोरोनाच्या रुग्णांची संख्या 391 वर title=

मुंबई : कोरोनामुळे देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कलम 144 जमावबंदी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. राजधानी दिल्लीच्या सीमा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. लखनऊ, नोएडासह युपीच्या 16 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 22 राज्यांमधील सरकार आपआपल्या पद्धधतीने उपाययोजना करत आहे. जनता कर्फ्यूनंतर सोमवारी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 400 च्या जवळ पहोचली आहे.

देशभरात रविवारी कोरोनाच्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या 7 वर गेली आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 391 वर पोहोचली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राजधानी दिल्ली आणि मुंबई सह अनेक मोठ्या शहरांमध्ये कलम 144 लागू आहे. 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. हा आठवडा भारतासाठी संवेदनशिल असणार आहे. कारण या आठवड्यात जर नियंत्रण मिऴवता आलं तरच कोरोनावर मात होऊ शकते.

मुंबईत लोकल सेवा पहिल्यांदा इतक्या दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानांच्या लँडीगवर बंदी घालण्यात आली आहे. 

बिहारमध्ये रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली. राजस्थानमध्ये देखील 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन असून सर्व सिमा सील करण्यात आल्या आहेत.

पंजाबमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं. 5 जिल्ह्यामध्ये ही बंदी असणार आहे. 

भारतीय रेल्वेने देखील कोरोनाला रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील सेवा बंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, हरियाणा, केरळ, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, गोवा, तेलंगणा आणि नागालँडमध्ये लॉकडाऊन असणार आहे.