विद्यापिठात बाहेरील लोकांची घुसखोरी; ७५० खोटी ओळखपत्र मिळाल्याचा दावा

विद्यार्थी ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याची भरपाई कशी होणार? कुलगुरुंचा भावनिक सवाल

Updated: Dec 16, 2019, 03:31 PM IST
विद्यापिठात बाहेरील लोकांची घुसखोरी; ७५० खोटी ओळखपत्र मिळाल्याचा दावा title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया (Jamia Millia Islamia University) विद्यापिठाच्या कुलगुरु नजमा अख्तर यांनी विद्यापिठाच्या आवारात दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्रवेशाविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. विद्यापिठात बाहेरचे लोक घुसले असून ७५० खोटी ओळखपत्र मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कुलगुरुंनी, विद्यापिठात मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून याची भरपाई कशी होणार असा सवाल उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी, मालमत्तेचं नुकसान पुन्हा भरुन काढता येऊ शकते परंतु विद्यार्थी ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याची भरपाई कशी होणार असा भावनिक सवालही त्यांनी केला आहे. याप्रकरणात उच्चस्तरिय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

नजमा अख्तर यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. आंदोलनात दोन विद्यार्थांचा मृत्यू झाल्याची अफवा आहे. अशी कोणतीही घटना घडली नसून कोणत्याही विद्यार्थाचा मृत्यू झाला नसल्याचं त्या म्हणाल्या. जवळपास २०० लोक जखमी झाले असून त्यापैकी अनेक आमचे विद्यार्थी असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलनादरम्यान जामियातील कोणतेही विद्यार्थी आंदोलनात सहभागी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जामिया मिलिया विद्यापिठाचे रजिस्ट्रार एपी सिद्धीकी यांनी, विद्यापिठाच्या आवारात पोलिसांद्वारा करण्यात आलेल्या गोळीबाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी ही अफवा पूर्णपणे नाकारली असल्याचं ते म्हणाले. विद्यापिठाच्या आवारात असेलल्या मस्जिदमध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यींनींसोबत गैरव्यवहार केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे, याबाबत आम्ही ही गोष्ट नाकारु शकत नसल्याचं सिद्धीकी म्हणाले.

ईशान्य भारतातील लोण आता मुंबई, हैदराबाद, लखनऊमध्येही पोहचलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चात हिंसाचार करत दिल्लीतील बस, खासगी वाहनं, दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांवरही हल्ला करण्यात आला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले.