Vande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?

Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर....   

सायली पाटील | Updated: Mar 15, 2024, 11:19 AM IST
Vande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?  title=
indian railway Vnade bharat passangers get only half litre of water bottle know the reason

Vande bharat news : भारतीय रेल्वेनं खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या वेगानं प्रगती केली, की असाध्य वाटणाऱ्या मार्गांवरही ही रेल्वे धावली. इतकंच नव्हे, तर रेल्वेचे नवनवीन आणि तितकेच वेगवान प्रकार प्रवास आणखी सुकर करताना दिसले. अशा या भारतीय रेल्वेकडून प्रवाशांपुढं सादर करण्यात आलेला एक कमाल नजराणा म्हणजे वंदे भारत ट्रेन. देशातील महत्त्वाच्या आणि तितक्याच वैविध्यपूर्ण भागांना जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधून आतापर्यंत अनेकांनीच प्रवास केला. लांब पल्ल्याचं अंतर किमान वेळात पूर्ण करणाऱ्या, प्रवासामध्ये प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय करून देणाऱ्या आणि अद्वितीय प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या वंदे भारत ट्रेनसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुळात हा निर्णय म्हणण्यापेक्षा हा एक मोठा ठरणार आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या या निर्णयामुळं प्रवाशांना फायदा होणार की त्यांची गैरसोय होणार हे मात्र येत्या काळातच ठरणार आहे. रेल्वेनं म्हणे चक्क पाण्याच्या बाबतीत कॉस्ट कटिंग केली आहे. प्राथमिक माहितीनुसार इथून पुढं वंदे भारतच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना एक लिटर पाण्याच्या बाटलीऐवजी अर्ध्या लिटरचीच बाटली देण्यात येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Petrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या 

मुंबईतून सुटणाऱ्या आणि अहमदाबाद, सोलापूर, शिर्डी, मडगाव, जालना दिशेनं जाणाऱ्या वंदे भारतमध्ये प्रवाशांना 'रेल नीर'ची 500 मिलीचीच पाण्याची बाटली दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. 

पाण्याच्या बाबतीत का केली कॉस्ट कटिंग? 

एक लिटर पाण्याची बाटली प्रवासात सोबत बाळगणं त्रासदायक ठरतं. ज्य़ामुळं गेल्या काही वर्षांपासून 500 मिली पाण्याचीच बाटली पुरवण्यात याली अशी मागणी प्रवाशांकडून सातत्यानं केली जात होती. त्यातही रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा काही प्रवासी बाटलीतील थोडं पाणी पिऊन उर्वरित पाणी फेकून देतात, ज्यामुळं बऱ्याच प्रमाणात पाणी वाया जातं. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 'रेलनीर' या रेल्वेच्याच बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडच्या वतीनं प्रवाशांना एक लिटरऐवजी अर्धा लिटरचीच बाटली देण्यात येत आहे.