नातवाच्या लालसेनं आजीकडून नातीची निर्घृण हत्या

वंशाचा दिवा म्हणून नातवाची आस

Updated: Oct 27, 2018, 10:14 AM IST
नातवाच्या लालसेनं आजीकडून नातीची निर्घृण हत्या  title=

जयपूर : मुलांपेक्षा आजी-आजोबांचं नातवंडांवर जास्त प्रेम असतात, असा एक समज आहे... परंतु, राजधानी जयपूरच्या मुरलीपुरा भागात एका आजीनंच आपल्या नातीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या महिलेला वंशाचा दिवा म्हणून नातवाची आस लागलेली होती... नातीच्या जन्मानंतर तिची ही इच्छा अपूर्णच राहिली होती... त्यामुळे रागाच्या भरात आजीनं आपल्याच दोन महिन्यांच्या नातीला पाण्याच्या टँकमध्ये बुडवून तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात येऊ नये यासाठी या महिला स्वत:च आपल्या नातीचा शोध घेण्याचं नाटक करू लागली... गोंधळ घालून तिनं संपूर्ण कॉलनी डोक्यावर उचलून धरली. इतकंच नाही तर आरोपी आजी विमला देवी हिनं आपल्याच सुनेवर (गुड्डी) तिच्याच मुलीच्या (दृष्टी) हत्येच्या कटात अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांच्या पोलिसी खाक्यासमोर या महिलेला आपल्या कृत्याची कबुली द्यावी लागली.

कशी केली हत्या?

शुक्रवारी दुपारी विमला देवी यांनी आपल्या सुनेला छतावर ठेवलेलं कपाट साफ करण्यासाठी पाठवून दिलं... आणि पाठिमागे तिनं आपल्या नातीचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु, पकडले जाण्याच्या भीतीनं या आजीनं नातीला पाण्याच्या टँकमध्ये टाकून दिलं... बराच वेळ सून खाली आली नाही तेव्हा सासूनं स्वत:च दृष्टी सापडत नसल्याचा कांगावा केला.

शोधाशोध सुरू असताना आजीनंच पाण्याच्या टँकमध्ये दृष्टीला शोधण्याचा सल्ला जमलेल्या लोकांना दिला. टँकचं झाकन खोलताच लोकांच्या पायाखालून जमीन सरकली. दोन महिन्यांच्या दृष्टीचं शव पाण्यावर तरंगत होतं. 

विमला देवी यांना पोलिसांनी अटक केलीय... पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.