मोठ्या संकटाची चाहूल? 12 तासात भारतासहीत भूकंपाने हादरले 3 देश; पहाटे पहाटे धरती हलली अन्...

Earthquake Strikes Myanmar: आज सकाळीच म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भारताबरोबरच नेपाळनंतर भूकंपाचे धक्के बसलेला म्यानमार तिसरा देश ठरला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 23, 2023, 09:30 AM IST
मोठ्या संकटाची चाहूल? 12 तासात भारतासहीत भूकंपाने हादरले 3 देश; पहाटे पहाटे धरती हलली अन्... title=
एकूण 3 देशांना 12 तासांमध्ये बसलेत भूकंपाचे धक्के

Earthquake Strikes Myanmar: म्यानमार-नेपाळसहीत जम्मू-काश्मीरमला भूकंपाचे धक्के बसले आहेत. मागील 12 तासांमध्ये जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज पहाटे 6 वाजता म्यानमारला भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तिव्रता 4.3 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पृष्ठभागाखाली 90 किलोमीटर खोलीवर म्यानमारमध्येच होता अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. मिझोरममध्ये रविवारी-सोमवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजून 9 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू मिझोरमची राजधानी आइजवाल शहराच्या पृष्ठभागाखाली 20 किलोमीटरवर होता. हे भूकंपाचे धक्के म्हणजे आफ्टर इफेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र वारंवार येणाऱ्या या भूकंपांमुळे मोठा भूकंप होणार की काय अशी भीत सर्वसमान्यांना वाटत आहे.

जम्मू-काश्मीरही भूकंपाचे धक्के

रविवारी रात्री जम्मू-काश्मीरला भूकंपाचा धक्का बसला होता. रविवारी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडा जिल्ह्याला भूकंपाचा धक्का बसला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती. नेपाळमध्ये रविवारी सकाळी रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे नेपाळचं राजधानीचं शहर काठमांडू पूर्णपणे हादरलं होतं. भूकंपामुळे 20 घरांची पडझड झाली होती.

2015 मध्ये 9000 जणांचा झालेला मृत्यू

वारंवार येणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सर्वासामान्यांमध्ये दहशत परसली आहे. 2015 साली आलेल्या भूकंपाची आठवण नेपाळमधील अनेकांना झाली. या भूकंपामध्ये 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार सकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी आलेल्या या भूंकपाचं केंद्र धाडिंग जिल्ह्यात होतं. या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. भूकंपाचे झटके बागमती आणि गंडकी प्रांतांसहीत इतर जिल्ह्यांमध्येही जाणवले.

75 घरांना भेगा

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मात्र अनेक ठिकाणी जमीन खचली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काठमांडूपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या धाडिंग जिल्ह्यामधील ज्वालामुखी नावाच्या प्रांतातील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 20 घरांची पडझड झाली आहे. तर 75 घरांना भेगा पडल्या आहेत. पहाटे आलेल्या या भूकंपानंतर रविवारी दुपारनंतर धाडिंगमध्ये पुन्हा 3 भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तिव्रता रिश्टर स्केलवर 4 पेक्षा अधिक होती.

आफ्टर इफेक्ट जाणवतात

सामान्यपणे भूगर्भामध्ये एखाद्या ठिकाणी भूकंप झाला तर त्याचे आफ्टर इफेक्ट अनेक दिवस आजूबाजूच्या परिसारांमध्ये आणि ज्या टॅक्टॉनिक प्लेटमध्ये भूकंप झाला आहे तिच्याशी संबंधित भूभागांमध्ये जाणवत असतात.

तासाभरात 3 झटके

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार धाडिंग जिल्ह्यामध्ये केंद्र असलेल्या या भूकंपाच्या झटक्यांची तिव्रता 5.1, 5 आणि 4.1 इतकी होती. भूकंप मापन केंद्रानुसार, सकाळी 8 वाजून 8 मिनिटांनी आलेल्या भूकंपाची तिव्रता 4.3 इतकी होती. सकाळी 8 वाजून 28 मिनिटांनी 4.3 तर 8 वाजून 59 मिनिटांनी आलेल्या भूकंपाची तिव्रता 4.1 इतकी होती.