भय्यू महाराजांना १० लाखांची चिंता ? हे तणावाचं कारण

 तुमचं चरित्र खराब केल जाईल अशी घरातूनच त्यांना धमकी मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Updated: Jun 16, 2018, 04:09 PM IST
भय्यू महाराजांना १० लाखांची चिंता ? हे तणावाचं कारण title=

मुंबई : संत भैयू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. स्वत:वर गोळी झाडण्याआधी ७ दिवस ते खूप तणावात होते. पत्नी आणि मुलगी कुहू यांच्यातील वाद हे तणावाचं कारण असल्याचं बोललं जात आहे. कित्येक ट्रस्टींनी हळूहळू पद सोडलं होतं, उद्योगपती, देणगीदार दिवसेंदिवस कमी होत होते यामुळे ते चिंतेत होते. तुमचं चरित्र खराब केल जाईल अशी घरातूनच त्यांना धमकी मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीला लंडन पाठवणं आणि पत्नीसोबतच्या तणावाशी ते लढत होते.कुहूला लंडनला पाठविण्यासाठी १० लाखाहून अधिक खर्च येणार होता. मुलीला लंडनला पाठविण्यासाठी ते लोन घेणार होते. घरातील भांडण समोर येऊ नयेत म्हणून ते प्रयत्न करत होते. सात आठ महिन्यांआधीच त्यांनी आपल्या संपत्तीचं वाटप केलं होतं. सर्व काही ठिक करुन मुलीला सेटल करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी कुहूला माहिती नसल्याचेही सांगितले जातंय. ती लग्नालादेखील आली नव्हती.

कुहूचं धक्कादायक वक्तव्य

मंगळवारी भय्यू महाराज यांनी बंदूकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर भय्यू महाराजांच्या आत्महत्येमागच्या कारणांची चर्चा सुरू झालीय. भय्यू महाराज आणि त्यांची पहिली पत्नी माधवी यांची मुलगी कुहू हिनंदेखील आपल्या वडिलांच्या आत्महत्येनंतर केलेली वक्तव्य चर्चेत आहेत. कुहूच्या म्हणण्यानुसार, तिनं आपल्या आईच्या - माधवी यांच्या मृत्यूनंतर कधीचं डॉ. आयुषी यांना आईचा दर्जा दिला नाही... त्यामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्येचं पाऊल उचललं... डॉ. आयुषी हिला तुरुंगात बंद करा, असंदेखील वक्तव्य कुहूनं केल्याचं स्थानिक मीडियातून समोर येतंय. कुहूच्या या दाव्याची पोलखोल पोलिसांच्या चौकशीतून होईल... पण, कुहूचं हे वक्तव्य नातेवाईकांसाठी चर्चेचा विषय ठरलंय. 

भय्यू महाराज यांनी ३० एप्रिल २०१७ रोजी दुसरा विवाह केला होता. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर भय्यू महाराजांनी डॉ. आयुषी यांच्यासोबत दुसरा विवाह केला होता. आई आणि मुलगी यांच्यासाठी आपण दुसरा विवाह करत असल्याचं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचं कारण चर्चेत आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

मोबाईलवर ते कॉल कुणाचे? 

भय्यू महाराज सोमवारी इंदोरहून महाराष्ट्राकडे येण्यासाठी निघाले होते. ते सेंधवापर्यंत आलेही होते. पण, प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलवर ७ वेळा कॉल आला. कॉल येताच महाराजांनी गाडीतील लोकांना खाली उतरवले आणि गाडीत बसून एकट्यानेच संवाद केला. मोबाईलचे बोलने संपताच त्यांनी सेंधवातूनच गाढी परत फिरवली आणि ते इंदोरला परतले... आणि इथंच त्यांनी मंगळवारी आत्महत्या केली. मी तणावातून आत्महत्या केलेली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असं भय्यू महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.