आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; १११ जणांचा मृत्यू

या पुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर प्राण्यांनादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Updated: Jul 21, 2020, 10:41 AM IST
आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; १११ जणांचा मृत्यू title=
संग्रहित फोटो

गुवाहाटी : आसाम  (Assam) मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवित हानी झाली आहे. पूरामुळे आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक पूरग्रस्त भागात अडकले असून त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुरु आहे. या पुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर प्राण्यांनादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या  (ASDMA) रिपोर्टनुसार, ब्रह्मपुत्रा नदीने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसाममधील 24 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. तर 24 लाखहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. एनडीआरएफ NDRF टीमकडून सतत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. 

काझीरंगा नॅशनल पार्कचा 85 टक्के भाग पूर परिस्थिती आहे. त्यामुळे येथील संरक्षित वन्य प्रजाती अस्तित्वावर मोठं संकट उभं राहिलं आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 113 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 140 प्राण्यांना वाचवण्यात यश आलं आहे. 

सोमवारी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींशी फोनद्वारे चर्चा केली. या चर्चेत आसाममधील गंभीर पूरस्थिती, कोरोना व्हायरस आणि बागजान तेल विहिरीत लागलेल्या आगीबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली. पंतप्रधानांनी राज्याबद्दल चिंता व्यक्त करत, शक्य त्या सर्व मदतीचं आश्वासन दिलं आहे.