स्कॉर्पिओ कारच्या अपघातात मुलाचा मृत्यू; बापाने थेट आनंद महिंद्रांविरोधातच दाखल केला गुन्हा

Complaint against Anand Mahindra: आनंद महिंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 27, 2023, 04:50 PM IST
स्कॉर्पिओ कारच्या अपघातात मुलाचा मृत्यू; बापाने थेट आनंद महिंद्रांविरोधातच दाखल केला गुन्हा title=
Anand Mahindra Booked In Kanpur father Lodged Fir After Son Death In Accident

Anand Mahindra Case: प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यासमवेत 13 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचे एअरबॅग न उघडल्यामुळं मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप एका वृद्ध व्यक्तीने केला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीने महिंद्राच्या शोरुममधून मुलासाठी स्कॉर्पियो खरेदी केली होती. धुक्यामुळं कार डिव्हाइडरला धडकली आणि त्याच अपघातात मुलाचा मृत्यू झाला. (Anand Mahindra Case)

राजेश मिश्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये त्यांनी श्री तिरुपती ऑटो एजन्सीमधून त्यांनी 17 लाख रुपयांची स्कॉर्पियो कार खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022मध्ये त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा त्यांच्या मित्रांसोबत लखनऊमधून कानपूरला येत होता. मात्र, दाट धुक्यामुळं त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार डिव्हाइडरवर जाऊन आदळली. यातच अपूर्वचा जागेवरच मृत्यू झाला. राजेश यांच्या म्हणण्यानुसार, सीट बेल्ट लावल्यानंतरच अपघातानंतर कारचे एअरबॅग्स उघडलेच नाहीत. त्यामुळं त्याच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या आरोपानंतर एजन्सीच्या व्यवस्थापकांनी राजेश यांना कंपनीच्या संचालकांशी बोलण्यास सांगितले. 

एजन्सीचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप राजेशने केला आहे. त्यांनी कारची तांत्रिक तपासणीदेखील केली तेव्हा त्यांना कारमध्ये एअरबॅग नसल्याची माहिती मिळाली.या प्रकरणी राजेश यांनी रायपुरवा पोलिस ठाण्यात तक्रार केली मात्र त्यावर पुढे काहीच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं राजेश यांनी कोर्टाचे दार ठोठावले. न्यायालयाच्या आदेशानंतर एजन्सीचे व्यवस्थापक चंद्र प्रकाश गुरनानी, विक्रम सिंग मेहता, राजेश गणेश जेजुरीकर, अनीस दिलीप शाह, थोथला नारायणसामी, हरग्रेव खेतान, मुथय्या मुरगप्पन मुथय्या आणि आनंद गोपाल महिंद्रा यांच्यासह १३ जणांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमे नोंदवण्यात आली. रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अपघातानंतर स्कॉर्पिओ उचलून रुमा येथील महिंद्रा कंपनीच्या शोरूममध्ये उभी करण्यात आली. कंपनीने वाहनात एअरबॅग लावल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.