चंबामध्ये ८०० शाळकरी विद्यार्थी पुरामुळे अडकले

उत्तर भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Updated: Sep 25, 2018, 11:22 AM IST
चंबामध्ये ८०० शाळकरी विद्यार्थी पुरामुळे अडकले title=

शिमला : हिमाचल प्रदेशात चंबामध्ये ८०० शाळकरी विद्यार्थी पुरामुळे अडकले आहेत. होली भरमौर शाळेत होणाऱ्या एका स्पर्धेसाठी हे विद्यार्थी गेले होते. मात्र पुरामुळे रस्ता बंद झाल्याने विद्यार्थी तिथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांसह किमान ४०० कर्मचारीही अडकल्याची माहिती आहे. बचावकार्याला प्रशासनाने सुरूवात केली आहे. गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिमाचलप्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ३९९ विद्यार्थी, ४१७ विद्यार्थिनी, ३५० पुरूष आणि ५१ महिला येथे अडकल्या आहेत.

अनेक राज्यांमध्ये पुराची स्थिती 

पावसामुळे उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पंजाबमध्ये मंगळवारी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोडा आणि हिमाचल प्रदेशमध्ये शाळा बंद आहेत.

१२६ ठिकाणी भूस्खलन

भूस्खलनाच्या घटनांमुळे बद्रीनाथ, केदारनाथ आणि यमुनोत्रीला जाणारे मार्ग बंद झाले आहेत. चारधामच्या यात्रेवर परिणाम झाला आहे. पावसामुळे राष्ट्रीय राजधानीमधील वाहतूक देखील मंदावली आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय योजना करण्याचे आदेश पंजाब सरकारने दिले आहेत. हिमाचल प्रदेशमधल्या पावसामुळे १२६ ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते खचले आहेत. मंडी, मनाली इथले राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. धुक्यामुळे वाहन चालवणं कठीण जातं आहे.

१२ जिल्ह्यांमध्ये हाय अर्लट 

हिमाचल प्रदेशमध्ये पुरानं हाहाकार माजवला आहे. पुरामुळे १२ जिल्ह्यांमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील रस्ते जलमन झालं आहेत. नद्यांनाही पूर आले आहेत आत्तापर्यंत शेकडो जनावरं, वाहन पुरात वाहून गेली आहेत.