Candida Auris : भारतात पसरतोय हा जीवघेणा संसर्गजन्य रोग

'कॅंडिडा ऑरिस' या फंगसमुळे ९० दिवसांच्या आत रूग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

Updated: Apr 10, 2019, 12:16 PM IST
Candida Auris : भारतात पसरतोय हा जीवघेणा संसर्गजन्य रोग title=

मुंबई : काळ जसा पुढे जात आहे, तसं जगात दिवसेंदिवस विज्ञान प्रगती करत आहे. विज्ञानासह वैद्यकीय जगही वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे विविध आजारही झपाट्याने पसरताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एक रहस्यमयी संसर्गजन्य रोग वेगाने आपल्याकडे पसरत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या रोगावर कोणताही उपचार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

'न्यूयॉर्क टाइम्स'च्या अहवालानुसार, 'कॅंडिडा ऑरिस' असे या फंगसचे नाव आहे. माणसाच्या मृत्यूनंतरही हा फंगस नष्ट होत नाही तर एका शरीरातून तो दुसऱ्या शरीरात वेगाने पसरतो. 'कॅंडिडा ऑरिस'चा पहिला रूग्ण ब्रुकलिनमध्ये आढळला होता. माऊंट सिनाई हॉस्पिटल फॉर ऐब्डॉमिनल शस्त्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीच्या ब्लड टेस्टमधून ती व्यक्ती एका संसर्गजन्य रोगाने पीडित असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी जेव्हा याबाबत तपासणी केली त्यावेळी हा 'कॅंडिडा ऑरिस' नावाचा प्राणघातक फंगस असून मृत्यूनंतरही तो रूग्णाच्या शरीरातून जात नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या फंगसची लागण झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी इन्टेन्सिव केयर यूनिटमध्ये दाखल केले. या व्यक्तीनंतर अशाप्रकारची अनेक प्रकरणं समोर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अहवालानुसार, यूएस आणि यूरोपनंतर आता हा फंगस भारत, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेतही पसरण्यात सुरूवात झाली आहे. आतापर्यंत या फंगससंबंधी समोर आलेल्या प्रकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत रूग्णाचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयात दाखल असलेले रूग्ण, उपकरांसह इतर अनेक वस्तूंच्या देवाण-घेवाणीमुळेही हा फंगस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

'कॅंडिडा ऑरिस' फंगस ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्याच लोकांमध्ये बळावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट मत देण्यात आले नाही. डॉ. स्कॉट लॉरिन यांनी 'कॅंडिडा ऑरिस' फंगस अतिशय धोकादायक असून यावर अॅन्टीफंगल मेडिकेशनचाही परिणाम होत नसल्याचे सांगितले. या फंगसवर आतापर्यंत कोणतेही औषध बनवण्यात आले नाही. या आजाराबाबत गोपनीयता ठेवण्यात आल्यामुळे लोकांमध्ये फंगसबाबत कोणतीही माहिती नसल्याने ही मोठी समस्या ठरत आहे.