तुमच्या जेवणाच्या ताटात पोळी- भात असतोच? आताच वाचा ही बातमी

आहाराच्या सवयींमधून काही पदार्थ हद्दपार करताना काहींचा नव्यानं प्रवेश करणंही तितकंच महत्त्वाचं. 

Updated: Oct 7, 2022, 11:00 AM IST
तुमच्या जेवणाच्या ताटात पोळी- भात असतोच? आताच वाचा ही बातमी title=
Avoiding roti and rice from food is good or bad read details

Roti and Rice replacement : 'जेवणाचं ताट वाढलंय... या लवकर...', अशी हाक मारल्यानंतर आपण घरात असू, तिथून त्या ताटापुढे बसण्यासाठी धाव मारतो. त्यातही भूकेचा आगडोंब माजला असेल, तर धाव मारण्याचा वेग सुस्साटच असतो. ताटापुढे बसल्यावर भाज्या, आमट्या (Roti, Rice) वगळल्या तर काही गोष्टी ताटात सर्रासपणे दररोजच दिसतात. त्या म्हणजे पोळी (चपाती) आणि भात. (Avoiding roti and rice from food is good or bad read details)

भारतामध्ये भात किंवा पोळीसोबत भाजी, आमटी खाण्याची पद्धत आहे. इथं दोन मुठभर भात असेल तर वाटीभर किंवा त्याहूनही कमी डाळ किंवा भाजी खाल्ली जाते. नाही म्हणूच नका, कारण असं खाणाऱ्यांपैकी तुम्हीसुद्धा एक असाल. काहींना तर, भाताशिवाय घास उतरत नाही. 

काहींचं पान पोळीशिवाय हलत नाही. चपाती, डोसा, भात या आणि अशा पदार्थांमध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आणि त्यामुळं असणारा टाइप-2 डायबिटीजचा धोका माहित पडल्यास मात्र तुम्हाला हादराच बसेल. 

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी चपातीऐवजी 'या' भाकऱ्यांचा करा आहारात समावेश!

ICMR अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केल्यास व्यक्तीला मधुमेहाचा (diabetes) कमी झोका असतो. विश्वास बसणार नाही, पण सरासरी भारतीयांच्या आहारात जवळपास 70 टक्के कार्बोहायड्रेट्स, 20 टक्के स्निग्ध पदार्थ (Fats) आणि 10 टक्के प्रथिनं असतात. 

शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्त्वांनुसार कार्बोहायड्रेट्सचं (carbohydrates) हे प्रमाण 50 टक्क्यांहून जास्त प्रमाणात खाली आणणं गरजेचं आहे. तर, प्रथिनं (Proteins) 20 टक्क्यांनी वाढवणं गरजेचं आहे. 

मुळात कार्बोहायड्रेट्स न घेणंही शरीरासाठी धोक्याचं. कारण, असं केल्यास मेंदूला आवश्यक असणाऱ्या ग्लुकोज (Glucose) पुरवठ्यावर त्याचे थेट परिणाम होतात. यावर तोडगा काय? तर, शीतपेय (Cold Drinks), फास्ट फूड (Fast Food), इंन्टंट फूड्स यावर पूर्णपणे बंदी आणा. 

आहाराच्या सवयींमधून काही पदार्थ हद्दपार करताना काहींचा नव्यानं प्रवेश करणंही तितकंच महत्त्वाचं. यासाठी नाश्त्यामध्ये तांदळाऐवजी नाचणी, ज्वारीची इडली. उकडलेली अंडी (Boiled Eggs), ऑम्लेट (omelette), ताजी आणि मोसमी फळं यांचा समावेश करणं उत्तम पर्याय असेल. 

जेवणाच्या वेळीसुद्धा ताटात अगदी नैवेद्याला दाखवतात इतका वाटीभर भात, त्याच्या समप्रमाणात भाज्या आणि डाळ, सॅलड समाविष्ट करावं.  भाज्या आणि डाळींचं प्रमाण वाढवलं तर हरकत नाही. उकडलेली कडधान्य, मांस, मासे, अंडी यांचाही आहारात समावेश करावा. 

दुपारच्या जेवणानंतर मधल्या वेळात सुकामेवा, फळं, नाचणीचं सत्त्वं असे पदार्थ सायंकाळी खाण्याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. तुलनेनं रात्रीच्या जेवणामध्ये पचण्यास हलकं असणारं अन्न घेण्यालाच प्राधान्य द्या. जेवणामध्ये ताक, सूप, उकडलेल्या किंवा परतलेल्या भाज्यांना पसंती द्यावी. झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवण करावं. जेणेकरून ते पचण्यास योग्य तो वेळ मिळेल. या साऱ्यामथ्ये शारीरिक हालचाल, शतपावली विसरु नये. थोडक्यात आहाराच्या काही सवयी तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यास अगदी सहज मदत करु शकतात.