महिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली

ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.

Updated: Jul 26, 2017, 03:59 PM IST
महिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली title=

मुंबई : ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.

टीम इंडियानं वर्ल्डकपमध्ये दमदार परफॉर्मन्स देत फायनलमध्ये आपली जागा निश्चित करून भारतीयांच्या मनातही जागा निर्माण केलीय. त्यालाच कायम राखत आता महिलांचं आयपीएल सुरू करण्यात यावं, अशी मागणी होऊ लागलीय... आणि या मागणीची सुरुवात टीम इंडियाची कॅप्टन मिथालीनं केलीय. 

'महिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं. यामुळे खेळाडुंचा पाया रचला जाऊ शकतो. तो आधार बनवण्याची हीच योग्य वेळ आहे' असं मिथालीनं म्हटलंय.

वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली, तसंच टीम इंडियाचं नेतृत्व करणं हे नेहमीच समाधानकारक राहिल्याचं मिथालीनं म्हटलंय.

५० लाखांच्या बक्षिसावर समाधानी?

बीसीसीआयनं उपविजेत्या टीममध्ये प्रत्येक खेळाडूला पन्नास लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. त्याबद्दल विचारलं असता, मी १९९९ पासून खेळतेय, पन्नास लाखांच्या बक्षीसावर समाधानी आहात का? हा प्रश्न नव्या खेळाडूंना विचारा... असं उत्तर मिथालीनं दिलंय. आता महिला टीमचं लक्ष्य टी-२० असणार आहे.