बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलाव क्षेत्रात जुलै 2023 मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली 10 टक्के पाणी कपात 9 ऑगस्टपासून रद्द करण्यात येणार आहे.

यंदा पावसाला उशीरा सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवटा करणाऱ्या तलाव क्षेत्रात जलसाठा घटला होता.

समाधानकारक पाऊस पडेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 1 जुलै 2023 पासून 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावातून पाणीसाठा होतो.

या सात तलावात संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर इतका असावा लागतो.

जुलै महिन्यात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे तलावातील पाणीसाठा 80 टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

पण ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असं मुंबई मनपाने स्पष्ट केलं आहे.

तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असं आवाहनही महानगरपालिकातर्फे करण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story